अहिल्यानगर ( प्रतिनिधी) – जिल्ह्यात रस्ते अपघातामध्ये अनेक व्यक्ती मृत्युमुखी पडतात. या अपघातांचे प्रमाण कमी होण्यासाठी जिल्ह्यातील अपघात प्रवण क्षेत्र शोधून तज्ज्ञांच्या साहाय्याने त्याचे सुरक्षा परिक्षण करत त्याठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा रस्ते सुरक्षा समितीच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी डॉ.आशिया बोलत होते.बैठकीस सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता भरतकुमार बाविस्कर, कार्यकारी अभियंता लक्ष्मीकांत जाधव, एस.आर. वर्पे, विजय कोटेचा, सहायक अधीक्षक अभियंता एस.डी. शेळके, प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी पवन टेंभुर्णे, उपशिक्षणाधिकारी मीना शिवगुंडे, पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे, वसंत पंदरकर, राज्य परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक राजेंद्र जगताप, अभिजीत पोटे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. आशिया म्हणाले, जिल्ह्यातील रस्ते अपघाताचे प्रमाण कमी होऊन सुरक्षित प्रवासाच्यादृष्टीने अपघातप्रवण स्थळी संबंधित विभागांनी समन्वय साधत तात्पुरत्या व कायमस्वरुपी उपाययोजना कराव्यात. जिल्ह्यातून पंढरपूरकडे अनेक दिंड्यातून वारकरी पायी चालत जातात. या सर्व रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी. ज्या ठिकाणी खड्डे पडले असतील ते बुजवण्यात यावेत. अहिल्यानगर शहरासह इतर ठिकाणच्या उ्डडाणपूल अथवा अपघातप्रवण स्थळांची पोलीस, सार्वजनिक बांधकाम विभाग व परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी करण्यात यावी. उपलब्ध आकडेवारीनुसार ज्या ठिकाणी अधिक अपघात होतात त्याठिकाणी अधिक प्रमाणात लक्ष देत ड्रंक अँड ड्राईव्ह, रिफ्लेक्टर, हेल्मेट आदींची तपासणी करण्यात यावी. अपघातस्थळी पोलीस, सार्वजनिक बांधकाम विभाग व परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन झालेल्या अपघाताचे विश्लेषण करत त्याची तंतोतंत माहिती आरडीएवर भरण्याच्या च्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
जिल्ह्यात अनेक ठिकाणी विनापरवानगी गतीरोधक उभारण्यात आले आहेत. या गतीरोधकांमुळेही अनेकवेळा अपघात घडतात. त्यामुळे विनापरवानगी उभारण्यात आलेले गतीरोधक काढण्यात यावेत. ज्या ठिकाणी आवश्यकता असेल त्याच ठिकाणचे गतीरोधक ठेवण्यात यावेत. गतीरोधकाच्या ठिकाणी रिफलेक्टर, बोर्ड आदी बसविण्यात यावेत. रस्त्यावरील दिशादर्शक फलकावर कुठल्याही प्रकारच्या राजकीय जाहिराती, शुभेच्छा संदेश दिसणार नाहीत याची दक्षता घेण्याच्या सुचनाही जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी यावेळी दिल्या.
अनेकवेळा बसस्थानकामध्ये खासगी वाहने उभे केल्या बस वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. अशा खासगी वाहनांवर कारवाई करण्यात यावी. रस्त्यांच्या दुतर्फा वृक्ष लागवड करण्यात यावी. जिल्ह्यातील बंद टोलनाके काढून टाकण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.