पाणी मिळण्यासाठी गटविकास अधिकारी शेवगाव यांच्याकडे निवेदनाद्वारे जनशक्तीची मागणी
शेवगाव ( प्रतिनिधी) :- तालुक्यातील मौजे दिंडेवाडी येथील नागरिकांचे पिण्याच्या पाण्यासाठी मोठे हाल होत असून त्यासाठी त्यांना इतरत्र भटकंती करावी लागत आहे. तरी मौजे दिंडेवाडी येथील नागरिकांसाठी मौजे आव्हाणे बु येथील पिण्याच्या पाण्याच्या टाकीवरून पाणी मिळावे व मौजे आव्हाने बु. ते दिंडेवाडी नवीन पाईपलाईन करून मिळावी अशा आशयाचे निवेदन जनशक्तीचे कार्याध्यक्ष राम पोटफोडे यांच्या अध्यक्षतेखाली मौजे दिंडेवाडी येथील ग्रामस्थांनी शेवगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी श्रीमती सोनल शहा यांच्याकडे दिले आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, मौजे दिंडेवाडी हे गाव आव्हाणे बु. ग्रामपंचायतला जोडलेले आहे. आव्हाणे येथील पिण्याच्या पाण्याच्या टाकीवरून यापूर्वी पाईपलाईनद्वारे दिंडेवाडी येथील हौदामध्ये पाणी येत असत. ही पाईपलाईन आता खराब झाली असल्याने गेल्या कित्येक दिवसापासून या गावाला पिण्याच्या पाणी येणे बंद झालेले आहे. येथील नागरिकांना दररोज विहिरीवरून लांबून पिण्यासाठी व जनावरांसाठी पाणी आणावे लागते. येथील बहुतेक नागरिक हे दुग्ध व्यवसाय व मेंढपाळ असून त्यांच्याकडे शेळ्या मेंढ्या गुर-ढोर मोठ्या प्रमाणात आहेत. येथील बहुतांश नागरिकांची दुग्धव्यवसाय व मेंढपाळ यावरच उपजीविका आहे. आव्हाणे बु ग्रामपंचायतकडे येथील नागरिकांनी अनेकदा यासाठीची मागणी केलेली आहे व वारंवार करत आहेत. परंतु त्यांच्या या प्रश्नाकडे आव्हाणे ग्रामपंचायतकडून सतत दुर्लक्ष होत आहे. तरी मौजे दिंडेवाडी येथील नागरिकांना आव्हाणे बु. येथील पिण्याच्या टाकीवरून नवीन पाईपलाईन करून त्वरित पाणीपुरवठा करावा अन्यथा येथील नागरिक मोठे जनआंदोलन करतील. असेही निवेदनात म्हटले आहे.
निवेदनावर राम पोटफोडे, बाळासाहेब दिंडे, महादेव रुपनर, प्रल्हाद वाघमोडे, देविदास गडकर, हरिभाऊ दिंडे, बालाजी शिंदे, अशोक आगलावे, गणेश गडकर, काकाजी दिंडे यांच्यासह अनेकांच्या सह्या आहेत.